‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटकावरून वाद : गौतम बुद्धांचा अवमान केल्याचा वंचित बहुजन आघाडीचा आरोप, पुण्यात गोंधळ

विशेष प्रतिनिधी

पुणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ या ऐतिहासिक नाटकाच्या पुण्यातील प्रयोगादरम्यान मोठा गोंधळ झाला. या नाटकात भगवान गौतम बुद्धांच्या विचारसरणीबाबत आणि ‘अहिंसेचा मार्ग’ याबाबत चुकीचा आणि अवमानकारक वाक्यप्रयोग करण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.

आज पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. नाटक सुरू होऊन सुमारे अडीच तास उलटले असताना उपस्थित वंचित कार्यकर्त्यांनी अचानक आक्षेप नोंदवत कार्यक्रमात गोंधळ घातला. नाटकातील काही संवाद गौतम बुद्धांचा अवमान करणारे असल्याचा त्यांचा दावा आहे.

सात्यकी सावरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या नाटकात भाजप खासदार मेधा कुलकर्णी या देखील उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीमुळे नाट्यगृहात वातावरण अधिकच तापलं. कार्यकर्त्यांनी त्यांच्या उपस्थितीत ही घटना घडल्याने त्यांनी निदर्शनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. मात्र, मेधा कुलकर्णी यांनी यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते म्हणाले की, “हे नाटक आम्ही पूर्ण पाहिलं असून त्यामध्ये गौतम बुद्धांबाबत चुकीचे व खोटे वर्णन करण्यात आले आहे. या नाटकाच्या संवादातून जाणूनबुजून बौद्ध धर्माच्या तत्वांवर हल्ला केला गेला आहे. त्यामुळे आम्ही हे नाटक चालू देणार नाही. आयोजकांवर आणि संहितेवर कारवाई झाली पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हे लेखन करताना जाणीवपूर्वक चुकीची मांडणी केली आहे.”

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. पण या प्रकरणामुळे नाटकाविषयीचा वाद चिघळण्याची शक्यता असून, यासंबंधी सध्या सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

या वादामुळे पुन्हा एकदा सावरकरांचे विचार, लेखन आणि त्यांची ऐतिहासिक भूमिका केंद्रस्थानी आली असून, राज्यात राजकीय आणि सामाजिक पातळीवर नव्या चर्चांना तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Controversy over the play ‘Sangeet Sannyasta Khadga

महत्वाच्या बातम्या