विशेष प्रतिनिधी
मुंबई: Nitesh Rane on Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील हे प्रामाणिक आहेत, मात्र त्यांचा वापर केला जात आहे. पेट्रोलचे पैसे कोण देत आहे, त्यांच्या मार्गावर लॉजची सोय कोण करत आहे, याची आपल्याला माहिती आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला रोहित पवार मदत करत असून, त्यांचे लोक या आंदोलनात बसले आहेत, असा आरोप भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी केला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. राणे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना कोण लक्ष्य करत आहे, हे महाराष्ट्राला माहीत आहे,. जर रोहित पवार यांनी हे आरोप फेटाळले, तर पुरावे देण्याचीही आमची तयारी आहे. शरद पवार यांनी अनेक वर्षे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री म्हणून काम केले आहे, तेव्हा त्यांनी मराठा आरक्षणासाठी काहीच का केले नाही?”महाविकास आघाडीच्या काळात मराठा समाजाचे आरक्षण का घालवले, याचे उत्तर शरद पवारांनी द्यावे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण हवे की ओबीसीतून, हे स्पष्ट करावे, असे आव्हान देताना राणे म्हणाले, मनोज जरांगेंना फक्त मराठवाड्यापूरती मागणी करायची असेल, तर सरकार विचार करेल. कोकणातील कुणबी, मराठा समाजाची भावना वेगळी आहे. आमच्याकडचा कुणबी आणि मराठा समाज आम्ही खूश आणि समाधानी आहे. सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्याची भूमिका कोकणाला किंवा महाराष्ट्राच्या अन्य भागाला आवडणार नाही. ओबीसी समाजाचे आरक्षण घेण्यापेक्षा त्यांना मराठा समाजाचे स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिलेले असल्यामुळे वाद का करायचा आहे?
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणे शक्य नाही. आपण मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिलेले आहे. त्याहीपेक्षा सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ यांसारख्या सवलती देत आहोत. इतर जातींच्या आरक्षणात मागणी करण्यापेक्षा दिलेल्या दहा टक्क्यामध्ये आणखी वाढ होऊ शकते का? त्याबद्दल चर्चा तरी करा. जरांगे पाटील येऊन देवेंद्र फडणवीसांसोबत बसले, त्यांच्याशी आरक्षणासंदर्भात सकारात्मक चर्चा केली, तर त्यांना हातात काहीतरी चांगलेच मिळेल, असा विश्वास नीतेश राणे यांनी व्यक्त केला.