विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे मनोज जरांगे पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. हैदराबाद गॅझएटियरची अंमलबजावणी 17 सप्टेंबरपूर्वी न केल्यास दसरा मेळाव्याला निर्णय घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
मुंबईतील आझाद मैदानात पाच दिवस बेमुदत उपोषण केल्यानंतर राज्य सरकारने मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या 8 पैकी 6 मागण्या पूर्ण करत असल्याचा जीआर काढला. यानंतर मनोज जरांगे यांचे 2 सप्टेंबर रोजी उपोषण संपले. मात्र आता आठवडा होत आला तरी प्रक्रिया सुरू झालेली नाही.
आझाद मैदानातील उपोषण संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे सध्या छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार घेत आहे. आज रुग्णालयातून घरी पाठवण्यात येणार आहे. त्याआधी माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्रामदिन आहे. त्याच्या आत हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीनुसार मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू झाली पाहिजे. आम्ही जितकं कौतुक केलं, पुन्हा आम्हाला वाटायला नको की तुम्ही फक्त हुलकावणी देत आहात की काय? त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच मी उपसमितीला सांगतो की, 17 सप्टेंबरच्या आत हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यामधील मराठा समाजाला कुणबी प्रमाण पत्र द्या. यासाठी मंगळावारी किंवा बुधवारी कॅबिनेट घेऊन कुणबी प्रमाण पत्राबाबत निर्णय घ्या. तसेच मराठा आरक्षणाबाबत सरकारने कुठलाही बदल करू नये. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी गावागावातील समितीला कामाला लावा. जर 17 सप्टेंबरच्या आत हैदराबाद गॅझएटियर नुसार कुणबी प्रमाणपत्र निर्णय नाही झाला तर मला मोठा निर्णय घ्यावा लागेल, असा इशा त्यांनी दिला.
ओबीसी समाजाकडून होणाऱ्या विरोधावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, कुणाचेही एकूण आमची हेळसांड होऊ देऊ नका. मराठ्यांच्या मुलांसाठी जीआर काढलाय, त्यामुळे मराठ्यांच्या मुलांना कुणबी प्रमाणपत्र द्या. मराठवाडा 100 टक्के आरक्षणमध्ये जाणार आहे. याचा आनंद झाला असला तरी सर्वांनी संयम ठेवावा. परंतु गॅझेटची तत्काळ भूमिका जाहीर नाही केली तर आम्हाला दसरा मेळाव्यात निर्णय घ्यावा लागेल, असा पुनरुच्चार करतानाच मनोज जरांगे यांनी मराठ्यांचा आता अपमान करू नका, अशी विनंती केली आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, आपला विजय झाला असला तरी खूप जणांना ही गोष्ट पचलेली नाही. त्यामुळे राज्य सरकारने येवला वाल्याचे ऐकू नये. जर तुम्ही आमच्या मागे लागले, तर आम्ही तुमच्या मागे लागू. मला कुणबीतून आरक्षण पाहिजे आहे. त्यामुळे वेळ आल्यावर जशाच तसे उत्तर देऊ. आम्हाला चॅलेंज केले तर, मी 1994 चा जीआर रद्द करेल, असा इशारा देतानाच 17 सप्टेंबर च्या आत मराठवाड्यात मराठ्यांच्या हातात कुणबी प्रमाणपत्र दिसले पाहिजे, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी राज्य सरकारला केले.