पाण्याखालील वाडीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोटीने नदीपात्रात

विशेष प्रतिनिधी

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात नदीपात्रातील काही वाड्यांतील घरे अजूनही पाण्याखाली आहेत. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः बोटीने नदीपात्रात उतरले व परिस्थितीची पाहणी केली. नागरिकांचे तातडीने पुनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवण्याचे आदेश त्यांनी दिले. Eknath Shinde

अतिवृष्टीमुळे पुरपरिस्थितीने थैमान घातलेल्या धाराशिव जिल्ह्यातील गावांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. भूम तालुक्यातील साडेसांगवीसह नदीकाठी वस्ती असलेल्या अनेक गावांना पुराचा मोठा फटका बसला असून, शेकडो शेतकरी व नागरिक संकटात सापडले आहेत.

पूरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधताना साडेसांगवी येथील पुरग्रस्त शेतकरी ज्ञानेश्वर डोंबाळे यांना आपल्या व्यथा माझ्यापुढे मांडताना भावना अनावर झाल्या. “सगळं काही वाहून गेलं आहे, आता आत्महत्या करणं बाकी राहिलंय…” अशा शब्दांत त्याने परिस्थिती सांगितली. या संकटातून सावरण्यासाठी ग्रामस्थांना तात्काळ मदत देण्याचे निर्देश देतानाच, शिवसेनेच्या वतीने ग्रामस्थांना तातडीने किराणा किटचे वाटप करण्यात आले.

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते आपत्तीग्रस्तांना इतर जीवनावश्यक वस्तू आणि ब्लॅंकेट्सचे वाटप करण्यात आले. यावेळी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार तानाजी सावंत, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधीक्षक रितू खोखर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महादेव आसलकर यांच्यासह जलसंपदा, कृषी, पाटबंधारे व आरोग्य विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या अस्मानी संकटात आपले सरकार सर्व नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. बाणगंगा आणि रामगंगा नदीवर मोठा पूल बांधण्याची तसेच घर आणि शेतीचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली. याबाबत बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून बोलून तात्काळ कार्यवाही करण्याचे शिंदे यांनी आदेश दिले.

Eknath Shinde enters the riverbed by boat to inspect the underwater wadi

महत्वाच्या बातम्या