विशेष प्रतिनिधी
मुंबई : आज सकाळी मुंबईत एका निनावी ई-मेलमुळे मोठी खळबळ उडाली. विधानभवनासह मुंबईतील चार महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. सकाळी ६ वाजून ५७ मिनिटांनी हा मेल प्राप्त झाला, ज्यामध्ये स्फोट घडवून आणण्याची वेळही नमूद करण्यात आली होती. या घटनेनंतर राज्यमंत्री योगेश कदम आणि गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत परिस्थिती स्पष्ट केली आणि जनतेला घाबरून न जाण्याचे आवाहन केले. Yogesh Kadam
राज्यमंत्री योगेश कदम यांनी या घटनेची पुष्टी करताना सांगितले की, विधीमंडळ बॉम्बने उडवून देऊ असा ई-मेल आला होता, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, प्राथमिक तपासात हा एक हॉक्स (खोटी धमकी) ई-मेल असल्याचे दिसून येत आहे. अनेकदा अशा प्रकारे ई-मेल पाठवून प्रशासनाचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जातो.
मिसाईलने उडवण्याच्या धमकीवर बोलताना योगेश कदम म्हणाले की, भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर जे वलय आहे, ते पाहता मिसाईल हल्ल्याची शक्यता अत्यंत कमी आहे. आखाती देशांतील युद्धाचा आणि या ई-मेलचा संबंध जोडणे चुकीचे आहे. तसेच, अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चर्चेवरून लक्ष भरकटवण्यासाठी हा प्रकार केला असावा, असा तर्क लावणेही चुकीचे ठरेल. सध्या बॉम्ब शोधक पथकाने संपूर्ण परिसराची पाहणी केली असून विधानभवन पूर्णपणे सुरक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सुरक्षा यंत्रणांच्या तत्परतेचे कौतुक केले. ते म्हणाले, देशात आणि राज्यात शांतता असताना काही विकृत व्यक्ती वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, गृहविभागाने तत्काळ पावले उचलली असून ही धमकी खोटी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा देश सुरक्षित हातात आहे, त्यामुळे कुणीही काळजी करण्याचे कारण नाही.
धमकी मिळताच मुंबई पोलिसांनी संपूर्ण दक्षिण मुंबईत आणि विशेषतः विधानभवन परिसरात सर्च ऑपरेशन राबवले. विधानभवनाच्या सर्व प्रवेशद्वारांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, प्रत्येक येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तीची कसून तपासणी केली जात आहे. हा ई-मेल कोठून आला आणि त्याचा ‘सोर्स’ काय आहे, याचा तांत्रिक तपास सायबर सेल आणि पोलिस यंत्रणा करत आहेत.
Nation Safe, Don’t Believe Rumours: Yogesh Kadam on Bomb Threat Email
महत्वाच्या बातम्या
- आंतरराष्ट्रीय युद्धाचा फटका शहरातील वसतिगृहांपर्यंत; गॅस टंचाईमुळे चुलीवर स्वयंपाक
- गोकुळ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे आदेश; 1200 सभासदांच्या पात्रतेवर सुनावणी
- एलपीजी गॅस दरवाढ व गॅस तुटवड्याविरोधात काँग्रेसचे गुरुवारी राज्यभर आंदोलन
- महाराष्ट्र वेगळे राष्ट्र असते तर जगाच्या अर्थव्यवस्थांमध्ये 30 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन