उद्धव ठाकरेंनी मुंबईसाठी काय केले विचारणाऱ्या एकनाथ शिंदे यांना अंधारे यांनी दिला त्यांच्याच पोस्टचा दाखला

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने आता सोशल मीडियावर वॉर सुरू झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी मुंबई व तेथील मराठी माणसांसाठी काय केले? असा सवाल केला होता. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी शिंदेंच्या 2020 मधील एका ट्विटचा दाखला देत ठाकरेंनी मुंबईसाठी काय केले हे दाखवून दिले आहे. शिंदेंना ही पोस्ट डिलीट न करण्याची विनंतीही केली आहे. Eknath Shinde

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी ठाकरे बंधूंवर निशाणा साधत त्यांनी मुंबई व तेथील मराठी माणसांसाठी काहीच केले नसल्याचा दावा केला होता. त्यांच्या या टीकेनंतर सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांची एक जुनी पोस्ट पोस्ट शेअर केली आहे.

उद्धव साहेबांनी मुंबई आणि मुंबईतल्या मराठी माणसासाठी काय केलं याचा लेखाजोखा तुम्ही स्वतः मांडत आहात. फक्त पोस्ट डिलीट करू नका तुम्हाला तुमचे गुरु आनंद दिघे यांची शपथ आहे, असे सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांची ही पोस्ट काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाली.

एकनाथ शिंदे आपल्या 23 फेब्रुवारी 2020 च्या पोस्टमध्ये म्हणतात, गिरणी कामगारांच्या घरांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. याप्रसंगी पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे,माजी राज्यमंत्री सचिन अहिर, माजी आमदार सुनील शिंदे,मुख्य सचिव अजोय मेहता,गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर उपस्थित होते.



म्हाडाच्या मुंबईतील 3900 घरांची लॉटरी प्रक्रिया 1 मार्चपासून आणि MMRDA च्या रेंटल हाऊसिंग स्कीममधील 2000 हून अधिक घरांची लॉटरी प्रक्रिया 1 एप्रिल पासून सुरुवात करण्याचे निर्देश मा. मुख्यमंत्री यांनी दिले. ठाणे परिसरातील 36 हेक्टर जागा गिरणी कामगारांच्या घरासाठी हस्तांतरित करण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.

शिंदेंनी ठाकरे बंधूंवर काय केली होती टीका?

एकनाथ शिंदे ठाकरे बंधूंवर टीका करताना म्हणाले होते, लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये जनतेचा महायुतीला कौल मिळाला आहे. त्यामुळे सत्तेसाठी झालेल्या युत्यांमुळे आम्हाला काहीही फरक पडत नाही. यांनी मुंबई महापालिकेकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहिले. आता ती कोंबडीच कापून खाण्याचे काम सुरू आहे. ठाकरे बंधूंची युती ही स्वार्थासाठी आणि स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी आहे. जनता त्यांना त्यांची जागा नक्कीच दाखवेल. युती झाली तरी विठ्ठल आमच्याकडे आहे. त्यांच्या पत्रकार परिषदेत मुंबईच्या विकासावर एक शब्दही बोलला गेला नाही. त्यांच्याकडे मुंबईच्या विकासाचा अजेंडा नाही. यांचा अजेंडा फक्त सत्तेसाठी आहे.

ठाकरेंनी युती केली म्हणजे सत्तेसाठी असं जर फडणवीसंच म्हणणं असेल तर मग अजित पवार अशोक चव्हाण आणि शिंदे सोबत असणारे तमाम भ्रष्टाचारी यांच्यासोबत भाजपने केलेली युती म्हणजे काय आध्यात्मिक समागम आहे का? असा सवालही सुषमा अंधारे यांनी केला आहे.

Andhare gave a quote from his own post to Eknath Shinde, who asked what Uddhav Thackeray had done for Mumbai.

महत्वाच्या बातम्या