‘हैदराबाद गॅझेट’ची अंमलबजावणी सुरु असतानाच 70 हजार मराठा विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात

विशेष प्रतिनिधी

पुणे : मराठा आरक्षणाचा विषय गाजत असताना मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची असलेल्या सारथी संस्थेबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. सारथी कडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती बंद केल्याने या विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात येण्याची शक्यता आहे. एकीकडे मराठा समाजासाठी ‘हैदराबाद गॅझेट’ लागू करून दुसरीकडे मराठा समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद केली जात आहे.

‘छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण, संशोधन व मानव विकास संस्थे’तर्फे (सारथी) २०२२ मध्ये ‘छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना’ सुरू करण्यात आली. मराठा समाजातील अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे आणि त्यांचे शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने शिष्यवृत्ती सुरु करण्यात आली. आता ही योजना बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे ७० हजार विद्यार्थ्यांवर शिक्षण अर्धवट राहण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यात पुण्यातील सुमारे सात हजार ५०० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटीआय, अमृत आणि तत्सम संस्थांसाठी सर्वकष धोरण तयार करताना, अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने २९ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या बैठकीत छत्रपती राजाराम महाराज सारधी शिष्यवृत्ती योजना’ बंद करण्याचा निर्णय घेतला, सारथी मध्ये सुरू असलेली योजना बार्टी’ आणि ‘महाज्येती संस्थांमध्ये सुरू नसल्याचा दाखला देत, हा निर्णय घेण्यात आला. शिष्यवृत्ती बंद झाल्यामुळे शिक्षणाची संधी हिरावली जाण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.



शिष्यवृत्ती बंद झाल्याने अनेक विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. माझे आई-वडील शेतीत काम करून घर चालवतात. त्यांना माझ्या शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने माझे शिक्षण बंद होणार होते. ही शिष्यवृत्ती मिळाल्याने मला पुढे शिकता येत होते. आता हो योजना बंद झाली, तर आमच्यासारख्या मुल्यांचे शिक्षण थांबेल की काय, अशी भीती वाटते, असे एका मुलाने नाव न प्रसिद्ध केल्याच्या अटीवर सांगितले.

मराठा समाजातील साडेतीन लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली ही महत्वाची शिष्यवृत्ती बंद झाल्याने समाजात मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला आहे. महायुती सरकार मराठा समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम करत आहे, असे मराठा क्रांती मोर्चाचे पुणे समन्वयक सचिन आडेकर यांनी सांगितले.

शाळेत जायचे. शिकायचे आणि पुढे काहीतरी मोठे करायचे हे स्वप्न होते. शिष्यवृत्तीमुळे ते शक्य होते. आता ती योजना बंद झाली. तर आमच्यासारख्या हजारो विद्याथ्यचि भवितव्य अंधारात गेले आहे. शिक्षणाची दारे बंद झाली. तर आम्हाला कोण आधार देणार? असा प्रश्न एका विद्यार्थ्यांने उपस्थित केला.

Education of 70 thousand Maratha students in jeopardy as ‘Hyderabad Gazette’ is being implemented

महत्वाच्या बातम्या