Parth Pawar : मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांची नावे आरोपपत्रातून वगळली

विशेष प्रतिनिधी 

पुणे: Parth Pawar पुण्यातील मुंढवा परिसरातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात अखेर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून या घडामोडीने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. आर्थिक गुन्हे विभागाने न्यायालयात सादर केलेल्या या दोषारोपपत्रात फक्त शीतल तेजवानी यांचे नाव आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात आधी चर्चेत असलेली दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांची नावे आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या दोघांना या टप्प्यावर दिलासा मिळाल्याची चर्चा आहे.Parth Pawar

जमीन गैरव्यवहार प्रकरणात पूर्वी पार्थ पवार यांच्यावरही आरोप करण्यात आले होते. मात्र, सादर करण्यात आलेल्या 1886 पानी विस्तृत चार्जशीटमध्ये त्यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दिग्विजय पाटील यांचाही उल्लेख आरोपपत्रात नाही. परिणामी, या दोघांविरोधातील तपासाची दिशा काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.Parth Pawar



दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कालच केली होती. त्यानंतर लगेचच आरोपपत्र दाखल झाल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी शीतल तेजवानी हिला या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपी मानत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. या कारवाईमुळे प्रकरणातील कायदेशीर प्रक्रिया पुढे सरकली असली, तरी अनेक प्रश्न अनुत्तरीतच राहिल्याचे दिसते.

अंजली दमानिया यांनी या संदर्भात संताप व्यक्त करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. महाराष्ट्र हा फक्त राजकीय दलालीचा अड्डा झाला आहे का? कायदा फक्त सामान्यांसाठीच आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी नमूद केले की, शीतल तेजवानी यांनी एसपी सिव्हिल सूट 2213/2025 दिग्विजय पाटील यांच्या विरोधात दाखल करत व्यवहार रद्द करण्याची मागणी केली आहे, तर दिग्विजय पाटील यांनी एसपी सिव्हिल सूट 2347/2025 शीतल तेजवानी यांच्या विरोधात दाखल केला आहे.

दमानिया यांनी पुढे म्हटले की, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी 8/12/2025 रोजी हा व्यवहार अवैध ठरवत तो रद्द करण्यात यावा, यासाठी अर्ज केल्याची नोंद आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मग पार्थ पवारांना शिक्षा कोण देणार? कशी देणार? हा व्यवहार गुंडाळून टाकला जाणार का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. न्याय हा शब्द राजकारण्यांना लागूच होत नाही का? अशीही त्यांनी विचारणा केली.

त्यांनी ईओडब्ल्यूच्या कारवाईवर टीका करत म्हटले की, आरोपपत्र फक्त शीतल तेजवानीवरच दाखल झाले आहे. मग दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांच्यावरील चौकशीचे काय? असा सवाल त्यांनी केला. हा न्याय नाही, ही न्यायाची थट्टा आहे, असेही त्यांनी नमूद केले. या पोस्टमुळे या प्रकरणाला राजकीय आणि सामाजिक पातळीवर अधिकच चर्चेचे स्वरूप आले आहे.

Mundhwa Land Scam Case: Digvijay Patil and Parth Pawar Dropped from Chargesheet

महत्वाच्या बातम्या