विशेष प्रतिनिधी
पुणे : वाढती लोकसंख्या, झपाट्याने विस्तारत असलेली आयटी हब्स आणि दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली वाहतूक कोंडी या पार्श्वभूमीवर पुण्यासाठी एक महत्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प पुढे येत आहे. महाराष्ट्र सरकारकडून पुण्यात तब्बल ५४ किलोमीटरचे भूमिगत रस्ता नेटवर्क उभारण्याची तयारी सुरू असून, या प्रकल्पाला ‘पाताळ लोक’ असे नाव देण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (PMRDA) या प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी विशेष प्रशासकीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली असल्याची माहिती समोर आली आहे.
कोणते भाग जोडले जाणार?
या भूमिगत रस्ता प्रकल्पाद्वारे पुण्यातील प्रमुख आयटी आणि व्यावसायिक केंद्रांना जोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. हिंजवडी, खराडी आणि हडपसर या भागांना या नेटवर्कमुळे थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. विशेष म्हणजे, प्रकल्पातील सर्वात मोठा टप्पा हा येरवडा ते कात्रज दरम्यानचा १४ किलोमीटरचा ट्विन-टनेल असणार असल्याचे सांगितले जात आहे.
वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांना दररोज तासन्तास रस्त्यावर अडकून राहावे लागते. या पार्श्वभूमीवर भूमिगत रस्ते प्रकल्पामुळे शहरातील मुख्य मार्गांवरील वाहनांचा ताण कमी होईल, प्रवासाचा वेळ वाचेल आणि इंधन बचतीसह प्रदूषणातही घट होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः आयटी क्षेत्रातील कर्मचारी आणि दररोज शहराच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाला प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो.
दरम्यान, या प्रकल्पाचा परिणाम पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रावरही होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. येरवडा, कात्रज, वाघोली, खराडी यांसारख्या भागांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढल्याने घरांच्या आणि जमिनींच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि घर खरेदीदारांसाठी हे क्षेत्र आकर्षणाचे केंद्र ठरू शकते.
A big solution to traffic congestion! A 54-kilometer underground road network will be built in Pune
महत्वाच्या बातम्या
- High Court : जनावरांच्या कत्तल निर्बंधांवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
- Rohit Pawar : “भाजपसोबत जाणार नाही”; रोहित पवारांच्या विधानाने राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण
- ‘नीट’चा पेपर कसा फोडला, ते ही पुरावा न सोडता; चौकशीसाठी पोलिसांनी गाठलं मांढरेंचं कॉलेज! तपासात काय सापडलं पाहा!
- शेतकऱ्यांना कर्जवाटप वाढवा, सीबीलमुळे कुणालाही रोखू नका; मुख्यमंत्री फडणवीसांचे बँकांना निर्देश