Jihad against Muslims : मुसलमानांविरोधात जिहाद असल्याचा आरोप करत अल कायदाची भारताला बदला घेण्याची धमकी

 विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मोदी सरकार सैन्य, राजनैतिक, सांस्कृतिक आणि मीडियातून इस्लाम, मुसलमानांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. मुसलमानांविरोधात भारताचा हा जिहाद आहे. आमचे कर्तव्य आहे अल्लाहचं नाव बुलंद करू. इस्लाम आणि मुसलमानांचे रक्षण करू. अन्याय झालेल्यांना मदत करू. आम्ही शपथ घेतो, अल्लाहच्या मदतीने आम्ही तोपर्यंत लढत राहू जोवर मुसलमानांवर झालेल्या प्रत्येक अत्याचारा बदला घेत नाही अशी धमकी अल कायदाने भारताला दिली आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले आहेत. त्यानंतर अल कायदाच्या भारतीय उपमहाद्विप शाखेकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. अस-सहाब-मीडियाच्या माध्यमातून ते प्रसिद्ध केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ६ मे २०२५ च्या रात्री भारताच्या भगवा सरकारने पाकिस्तानातील ६ ठिकाणी हल्ले केले. विशेषत: मस्जिद, झोपड्यांना टार्गेट केले. त्यात अनेक मुसलमान शहीद आणि जखमी झालेत. आम्ही अल्लाहचे आहोत, त्याच्याकडे जाऊ. अल्लाह शहीदांना जन्नतमध्ये उंच स्थान देईल, जखमींना लवकर बरे करेल. आमीन..हा हल्ला भगवा सरकारच्या गुन्ह्याच्या यादीतील आणखी एक अध्याय आहे.तसेच भारताचे इस्लाम आणि मुसलमान यांच्याविरोधातील युद्ध नवीन नाही. हे अनेक वर्षापासून सुरू आहे. भारत आणि काश्मीरच्या मुसलमानांवर खूप अत्याचार होत आहेत.

दरम्यान, पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी खोटा दावा करत मंगळवारी रात्री झालेल्या हल्ल्यात भारताचे ८० लढाऊ विमाने सहभागी होती, असा आरोप केला आहे. भारताच्या या हल्ल्याबाबत आम्हाला आधीच गुप्तचर यंत्रणेने माहिती दिली होती. आमचे सशस्त्र दल २४ तास हायअलर्टवर होते. मातृभूमीच्या रक्षणासाठी आम्ही तयार आहोत. पहलगाम हल्ल्याची पारदर्शक चौकशी करण्याची आमची मागणी आहे असं सांगत भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानी सैन्य तयार आहे, अशी वल्गना केली आहे.

Al Qaeda threatens India with revenge, alleging Jihad against Muslims

महत्वाच्या बातम्या