राज्यात आचारसंहितेच्या काळात ६२ कोटींचा बेकायदेशीर मुद्देमाल जप्त

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील २९ ता महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने निवडणूक आचार संहिता अंमलबजावणी यंत्रणांनी मोठी कारवाई केली आहे. त्याअंतर्गत १५ डिसेंबर ते ६ जानेवारी या काळात आचारसंहिता भरारी पथकांनी, महापालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणांनी केलेल्या विविध कारवाईत ६२ कोटींचा बेकायदेशीर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात ४८ कोटींचे अमली पदार्थ, ५ कोटींची दारू, तर ८ कोटी रोकड आदींचा समावेश आहे. तर ५५८ धारदार शस्त्रे आणि ७४ बंदुका जप्त करण्यात आल्या असून याप्रकरणी ३८ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.



यासंदर्भातील एकत्रित अहवालानुसार, विविध महापालिका क्षेत्रांत आचारसंहितेच्या उल्लंघनासंदर्भात आयोगाकडे १८६ तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी १५२ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. तर ३४ तक्रारी प्रलंबित आहेत. याशिवाय निवडणुकीदरम्यान बेकायदेशीर व्यवहार रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रोकड जप्त करण्यात आली असून एकूण ८ कोटी ३२ लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. त्याचसोबत दारू आणि अवैध मद्यविक्रीविरोधात केलेल्या कारवाईत ५ कोटी ९५ लाख किमतीची तब्बल १ लाख ८७हजार लिटर दारू जप्त करण्यात आली आहे.

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने बेकायदेशीर शस्त्रास्त्र बाळगणाऱ्यांविरोधातही कडक पावले उचलण्यात आली आहेत. त्याअंतर्गत ७४ पिस्तुल व ५५८ धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली असून या संबंधित ३८ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. एकूणच आदर्श आचारसंहिता प्रभावीपणे राबवण्यासाठी आणि महापालिकेच्या निवडणुका भयमुक्त, पारदर्शक व शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने आचारसंहिता भरारी पथके व पोलीस प्रशासनाकडून व्यापक पातळीवर कारवाई सुरू आहे.

62 Crore Worth of Illegal Goods Seized During Model Code Period in Maharashtra

महत्वाच्या बातम्या