Congress : वंचितच्या ‘गॅस’मुळे मुंबईत काँग्रेस गॅसवर

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Congress  मुंबई महापालिका निवडणुकीत 16 जागांवर उमेदवार मिळाले नसल्याने अडचणीत सापडलेल्या काँग्रेस (Congress ) -वंचित आघाडीला आता आणखी एका अडचणीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने वंचित पक्षाला दिलेलं गॅस सिलेंडर चिन्ह हे अपक्ष उमेदवारांनाही मिळणार असल्याची माहिती आहे. ज्या प्रभागात वंचितचा उमेदवार नाही आणि अपक्ष उमेदवाराने गॅस सिलेंडर चिन्हाची मागणी केली आहे अशा उमेदवारांना ते चिन्ह दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काँग्रेसच्याही मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे.



उमेदवारी अर्ज दाखल करताना वंचितकडून इतर उमेदवारांना चिन्ह देण्यासाठी योजना गोठवण्याची मागणी करणं अपेक्षित होतं. मात्र वंचितने तशी मागणी न केल्याने निवडणूक आयोग आता अपक्ष उमेदवारांनाही गॅस सिलेंडर हे चिन्ह देणार आहे. काही अपक्ष उमेदवारांनी गॅस या चिन्हाची मागणी केली आहे. त्यानुसार निवडणूक आयोग त्यांना ते चिन्हे देण्याची शक्यता आहे. याचा फटका कुठे ना कुठे वंचित आणि काँग्रेसच्या (Congress ) आघाडीला बसणार असं चित्र आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं परत केलेल्या 16 जागांवर बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे. वंचितनं या 16 जागा अगदी ऐनवेळी परत केल्या.वंचितला सोडलेल्या जागांवर काँग्रेसनं त्यांच्या पर्यायी उमेदवारांना एबी फॉर्मही दिले नव्हते. त्यामुळं या जागांवर काँग्रेसचा बंडखोर किंवा अपक्ष उमेदवार असेल तर त्यांना काँग्रेसकडून पाठिंबा देण्यात येणार आहे. काँग्रेस बंडखोर आणि अपक्ष उमेदवार नसेल तरच महायुतीतील बंडखोर उमेदवाराची चाचपणी करूनच त्यांना पाठिंबा जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र यातही काळेबेरे असल्याचा संशय व्यक्त केला. ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार होते त्याच 16 ठिकाणी वंचितने अर्ज भरला नाही असा दावा करत शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी वेगळे संकेत दिले. काँग्रेसनेच वंचितला अनेकदा भाजपची बी टीम म्हणून हिणवलं होतं. काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांची आघाडी होईल याबाबत अनेकांना शंका होती. पण दोन दशकानंतर हे दोन्ही घटक एकत्र आले. मुस्लिम-दलित मतं एकत्र झाली तर अर्थातच भाजपला फटका बसणार होता. मात्र आता 16 जागा वंचितने अचानक परत केल्या. त्यामुळे त्या जागांवर ना काँग्रेसचा उमेदवार उभा राहू शकला नाहा वंचितचा. आता त्याचा कुणाला फायदा होईल, कुणाला तोटा हे कळण्यासाठी 16 तारखेपर्यंत थांबावं लागेल.

Congress Gasps in Mumbai as Vanchit’s ‘Gas’ Sparks Political Heat

महत्वाच्या बातम्या