विशेष प्रतिनिधी
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी भारताच्या धार्मिक सहिष्णुता आणि समावेशकतेच्या परंपरेवर भाष्य करताना “इराणी” हे आडनाव भारताने पारशी समाजाला दिलेल्या आश्रय आणि संरक्षणाच्या परंपरेचे प्रतीक असल्याचे सांगितले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आयोजित ‘मुंबई व्याख्यानमाला’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या दोन दिवसीय व्याख्यानमालेचा विषय “संघाच्या शतकीय प्रवासाचे नवे क्षितिज” असा आहे. संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासाचा आढावा आणि सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान यावर या कार्यक्रमात चर्चा करण्यात येत आहे.
या वेळी बोलताना स्मृती इराणी यांनी सामाजिक माध्यम ‘एक्स’ (X) वर त्यांना आलेल्या एका प्रतिक्रियेचा उल्लेख केला. काही वापरकर्त्यांनी जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपले “इराणी” आडनाव बदलून “इस्रायली” करावे, असा सल्ला दिला होता. मात्र त्यांनी हा सल्ला नाकारत आपल्या आडनावामागील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अर्थ स्पष्ट केला.
इराणी म्हणाल्या की, “इराणी” हे आडनाव भारताच्या सभ्यतागत मूल्यांचे प्रतीक आहे. जगातील अनेक भागांत धर्माच्या नावावर हिंसाचार आणि संघर्ष घडत असताना भारताने शतकांपूर्वी अत्याचाराला बळी पडलेल्या पारशी समाजाला आश्रय आणि सन्मान दिला.
भारताची सांस्कृतिक परंपरा सनातन मूल्यांवर आधारित असून विविध धर्म, श्रद्धा आणि परंपरा असलेल्या लोकांना एकत्र राहण्याची मोकळीक येथे कायम राहिली आहे, असे त्यांनी सांगितले. भारतातील ही स्वीकारशीलता आणि संरक्षणाची परंपरा आजही देशाच्या ओळखीचा महत्त्वाचा भाग असल्याचेही इराणी यांनी नमूद केले.